कोनाडा ...
परवाचीच गोष्ट. सुट्टी असल्याकारणाने मार्केट मधून चालत घराकडे येत होते. घराच्या वाटेवर महानगरपालिकेने खूप मोठे काम काढले आहे. जवळ जवळ सहा महिने चालणार आहे म्हणे. त्यामुळे अर्थातच
त्याच्या आजूबाजूला " नो एन्ट्री " चे बोर्ड झळकताना दिसत होते. जे काम चालले आहे ते वरळीसमुद्रा कडे
जाणारया रस्त्यावर असल्याने अर्थातच बोर्डाच्या पलीकडील मोठाच्या मोठा रस्ता गाड्यांसाठी बंद झाला आहे.
सहज लक्ष गेल... तर तिकडे बाईक वरून येऊन तरुण मुले सेल्फी काढण्यात गुंग झाली होती. जणू काही त्या
मुलांना एक कोनाडा सापडला... दृश्य मोठ लक्षणीय होत. ...
मागे मोठे मोकळे आकाश...
दूरपर्यंत पसरलेला रिकामा रस्ता...
आणि
त्या पार्श्वभूमीवर तरुण तरुणाईचा घोळका.
बाईक वर बसून....एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवत, वेगवेगळ्या पोझेस देत चाललेले फोटो सेशन ... आणि अर्थातच सेल्फी...
खरतरं फोटो काढायचा होता त्या तरुणाईचा पण मोबाईल नव्हता...
रस्त्याच्या दुसरया बाजूला अनेक मोटर बाईक्स उभ्या केलेल्या ... काही बायका विशेषतः घर काम करणाऱ्या गप्पा मारत उभ्या.. चेहऱ्यावरचे भाव म्हणजे आता आम्हाला इथून कोणी हलवणार नाही असे...
दृश्य बघितलं आणि मला लहानपणची आठवण झाली...
घर कितीही मोठ असो वा लहान असो.. बालपणी असेच आपण कोनाडे शोधत होतो....
मग ते भातुकली खेळण्यासाठी असोत वा आई मार देईल म्हणून लपण्यासाठी असो..
मला तर लहान असताना एका स्टुलात जाऊन वाचत बसायला आवडायचं..
अगदी भातुकलीचा खेळ खेळण्यासाठी आम्ही चाळीत सर्वजण एका कोनाड्यात जाऊन खेळायचो.. कि जेणे करूण कोणी आम्हाला हलवणार नाही..
अगदी भातुकलीचा खेळ खेळण्यासाठी आम्ही चाळीत सर्वजण एका कोनाड्यात जाऊन खेळायचो.. कि जेणे करूण कोणी आम्हाला हलवणार नाही..
पूर्वी प्रत्येक घराघरात कोनाडे असायचे. काही वेळेला त्या कोनाड्यात देव असायचे, पुस्तक असायची तर आणखी काही..
वय वाढलं तरी अजूनही असे कोनाडे शोधून वाचत बसायला मला आवडत... पण अर्थात ते कोनाडे मोठे असावे
लागतात... नाहीतर बाहेर पडायची पंचाईत व्हायची.
का कुणास ठाऊक ... प्रत्येकाच्या मनात असा एक कोनाडा असतोच नाही का ?
जिथे आपल्याला स्वस्थता असावी असं वाटतं.. हा कोनाडा हि आपल्या हक्काची जागा वाटते. ...
पण ह्या कोनाड्याचे अनेकजण सकारात्मक आणि नकारात्मक वापर करताना आपण ऐकतो... पण म्हणून
कोनाड्याचे महत्व काही कमी होत नाही.
आता आमच्या त्या मोठ्या कोनाड्यात थोड्याच दिवसात क्रिकेट सुरु होईल, पत्त्याचे डाव रंगतील, प्रेमिकांचे अड्डे तयार होतील ... पण अर्थात वेळा वेगवेगळ्या असतील...
वरळी बांद्रा सी लिंक वरून येणाऱ्या वाहनांची रहदारी आता काही काळासाठी तरी बंद राहील ... आणि
तरुणाईला सापडलेल्या ह्या नवीन कोनाड्यात भविष्यातील स्वप्ने रंगवली जातील...