रविवार, १५ फेब्रुवारी, २०१५

आत्मविश्वास
कालचा आणि आजचा दिवस खूपच छान गेला. ऑफिस सुटल्यावर गोरेगाव ला ताई कडे ब्रुनो ग्रोनिंग चे माहितीपर सत्र समजून घेतलं. नंतर पु. ल. देशपांडे सभागृह पार्ल्याला लोकसत्ता तर्फे आयोजित केलेल्या महाराष्ट्राचा वक्ता/वक्ती कोण ह्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचलेल्या ९ स्पर्धकांचे वक्तृत्व ऐकायला गेले. तर आज म्हणजे रविवारी संध्याकाळी आठवड्याच्या संध्याकाळची समाप्ती स्वरांगी मराठे च्या सुश्राव्य गायनाच्या मैफिलीने झाली. तीनही कार्यक्रमाना मजा तर आली पण मला जाणवलं ते म्हणजे जर तन मन धन लावून अभ्यासपूर्ण, वैचारिक बैठक असेल व स्वतः वरचा आत्मविश्वास असेल तर कोणतेही काम आपण उत्तम करू शकतो. विचारांची सुस्पष्टता आपल्याला ठामपणा कडे नेते नव्हे आत्मविश्वास निर्माण करते. ब्रुनो ग्रोनेनिंग माहितीपर सत्रात असे लक्षात आले कि शेवटी मनाची शांतता असेल तर आत्मविश्वास आपोआप निर्माण होतो. तसेच जी गोष्ट आपण करणार त्यावर विश्वास हवा. थोडक्यात काय मुलभूत शांत राहणे, विचारांचा गोंधळ होऊ न देणे हे जर मुळात साधता आले तर काहीही अशक्य नाही. आपला स्वतःवरच विश्वास नसेल तर तुम्ही उत्कृष्ट सादरीकरण करू शकत नाही. परिणामी समोरची व्यक्ती असो कि आपली परीक्षा असो आपण ते निभावू शकत नाही. तेंव्हा आधी विश्वास ठेवा स्वतः वर आणि निश्चिंत रहा. मग विजय तुमचाच आहे. कालचे सर्व स्पर्धक तरुण होते हि अत्यंत आनंदाची गोष्ट होती आणी जवळ जवळ५०० ते १००० च्या जनसमुदायासमोर अत्यंत निर्भीडपणे सर्वांनी आपले विचार मांडले. खूप मजा आली ऐकताना. जेथे एकमेकांशी संवाद कमी झाला आहे तेथे समुदायासमोर बोलण्यासाठी लागणारा आत्मविश्वास ह्य मुलांमध्ये होता हि अचानक घडलेली घटना नाही तर त्यांच्या बालपणापासून हळू हळू घडत गेलेली ती एक प्रक्रिया आहे. निशा देसाईच्या वाक्तृत्वाबद्दल सांगायचे झाले तर एका शांत लयीत घाई घाई न करता पण समोरच्या ला समजावून देत ठामपणे विचार मांडत पण मुद्देसूद असे तिचे भाषण ऐकताना मजा आली. तेच स्वरांगी च्या गाण्याबद्दल म्हणता येईल. लहानपणापासून तिच्यावर झालेले गाण्याचे संस्कार, शांत, संयमी आणि हसरा चेहरा आणि गातानाचा असणारा आत्मविश्वास ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे तिचे झालेले उत्कृष्ट गाणे. भरीस भर म्हणजे आज भारताने पाकिस्तानवर केलेली मात. विराट कोहली चे शतक हे सुद्धा मला त्याच्या शांत,संयमी वृत्तीमुळे साध्य झालेले यश आहे असे म्हणावे लागेल. करोडो च्या जनसमुदायासमोर एकाग्र चित्ताने, आत्मविश्वासाने, प्रचंड दबाव असताना शांतपणे खेळणे हि सर्वात कठीण गोष्ट कोहलीने लीलया पेलली आणि भारताला विजयश्री मिळवून दिली. त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आज वयाच्या ५० शी कडे जाताना ह्या शांतपणाचे फायदे आता कळू लागले आहेत. आणि त्याच्यामुळे कुठेतरी मनातली भीती जाऊन स्वतःबद्दलचा आत्मविश्वास वाढू लागला आहे. त्यामुळे निर्णयक्षमता देखील वाढीस लागली आहे असे जाणवते. जी गोष्ट कळायला माझ्यासारख्या चंचल व्यक्तीला दीर्घ कालावधी लागला तो कालावधी माझ्या या ब्लॉग वरच्या लिखाणाने तरुणांना लवकर कळावा आणि शांततेतून निर्भिडपणाकडे आत्मविश्वासपूर्वक वाटचाल व्हावी म्हणून हा लेखप्रपंच.

1 टिप्पणी:

तरंग...एकअप्रतिम कलाकृती धावणारे मन आणि मनात उठणारे तरंग आपण थांबवू शकतो का ? हे  तरंग वेगवेगळे असतात आपण अनुभवलेल्या गोष्टींचे,  घ...